हिंगोली – गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गजराज बाल गणेश मंडळाच्या पुढाकारातून येथील रामलीला मैदानावर अंतरराष्ट्रीय कथाकार प. पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांची श्रीमद भागवत कथेला आजपासून शोभा यात्रेनंतर सुरुवात होणार असल्याने शहरातील प्रत्येक विद्युत पोल , मुख्य ठिकाणी भगवे झेंडे लावल्याने शहर अक्षरशः भगवे मय झाल्याचे दिसून येते.
येथील रामलीला मैदानावर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावार 19 मार्च ते 25 मार्च दुपारी साडे चार ते साडे सात यावेळत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुख्य यजमान म्हणून स्व. मखनलाल शंकरलालजी गौड यांच्या स्मृती प्रित्यर्थ नंदकिशोर शर्मा म्हाळसा पुरवाले हे राहणार आहेत. त्यानुसार रामलीला मैदानावर बुधवारी अखेरचा हात फिरवल्या जात आहे. मोठा सभामंडप उभारला असून या ठिकाणी विविध स्टोलची उभारणी ही केली जात आहे. कोणतीही व्यवस्था राहू नये यासाठी समितीकडून अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
आज शोभा यात्रा दुपारी साडे बारा ते दीड या वेळेत येथील सेक्रेट हर्ट स्कुल मध्ये भोजन आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजता जवाहर रोड मार्गे मार्गक्रमण करीत पुढे रामलीला मैदानावरील कथा स्थळी चारच्या सुमारास आगमन होईल. त्यानंतर रमेश भाई ओझा यांच्या श्रीमद भागवत कथेला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी बुधवारी शहरातील सर्व रस्त्यावर भगवे झेंडे लावल्याने संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे.
दरम्यान, कथा ऐकण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या भावीकासाठी पार्किंग व्यवस्था, राहण्याची व्यवस्था अगदी अल्प दरात करण्यात आली. आता उन्हाळा असल्याने तापमान वाढत आहे. यासाठी समिती कडून मंडपावर पाण्याचे फवारे सोडले जाणार असल्याने कथा मंडप थंडगार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.