हिंगोली “वंदे मातरम्” या गीतास येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर “वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सकाळी 9.30 ते 10.40 या कालावधीत होईल. वंदे मातरम गिताने भारतीयांना एकत्र आणण्यात आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले असून, 1896 साली रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच ते गायले होते. वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत प्रेरणादायी भूमिका निभावली. वंदे मातरम हे भारतमातेच्या ममतेचे प्रतीक आहे आणि ते ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते. राज्यातील शासकीय तालुका व जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये “वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
जिल्ह्यात वंदे मातरम् गिताच्या 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हिंगोली येथे जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर, सेनगाव येथे जिल्हा परिषद शाळेत, कळमनुरी येथे जिल्हा क्रीडा संकुल तथा जिल्हा परिषद शाळा मैदान, वसमत येथे बहिर्जी स्मारक शाळा मैदानावर आणि औंढा नागनाथ येथे आयटीआयच्या बाजूला असलेल्या संत सेवालाल मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी, पालक व समाजातील विविध घटकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.